SINDHUDURG : सिंधुदुर्गात पावसाचे दमदार पुनरागमन; भात लावणीच्या कामांना वेग, शेतकरी सुखावला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला काही दिवस पावसाने खंड दिल्यामुळे शेतीची कामे रखडली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जोमाने भात लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे.
पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला असून भात लावणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत शेतकरी कुटुंबे लावणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रखडलेली शेतीची कामे मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.पावसाचा हा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत भात लावणीची बहुतांश कामे पूर्ण होतील, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. या पावसामुळे भात पिकांसह इतर पिकांनाही जीवदान मिळाले असून संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.










